राहुरी : वेबटीम राहुरी नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, विशेषतः चाचा तनपुरे यांनी साडेचार वर्...
राहुरी : वेबटीम
राहुरी नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, विशेषतः चाचा तनपुरे यांनी साडेचार वर्षानंतर जागे होऊन सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप केले आहेत, त्यामुळे सत्ताधारी लोकांनीही जशास तसे उत्तर देऊन चाचाचा थेट कुंभकर्ण अशा शब्दात गौरव केला. आता भरपावसाळ्यात सुरू झालेल्या या चिखलफेकीत राहुरीतील हे राजकारण गढूळ होणार हे नक्की! दरम्यान, सत्ताधार्यांनी'कुंभकर्णा'पासून सुरू केलेले हे रामायण शेवटी पालिका निवडणुकीत महाभारतापर्यंत येणार आहेचं, यात कदाचित हर्ष अरुण तनपुरे विरोधात प्रतीक चाचा तनपुरे अशी भावकीत फाईट झाली तर फारसे नवल वाटणार नाही.
राहुरीचे राजकारण हे नेहमीच तनपुरे घराण्याभोवती फिरते. मग ते बापूसाहेब तनपुरे असो की चाचा तनपुरे. मात्र शहरात राजकारण रंगत असले तरी नगरपालिका ही बहुदा बापूसाहेबांच्या जनसेवा मंडळाच्याच ताब्यात राहिली आहे. डॉ उषाताई तनपुरे, प्राजक्त तनपुरे यांनी ही सत्ता टिकवली आहे, फुलवली आहे तर चाचा तनपुरे यांनी प्रत्येकवेळी त्यांना प्रखर विरोध करून विरोधक जिवंत ठेवला आहे. अर्थात, काही वर्षांपासून ही धार काहीशी कमी झाली म्हणा किंवा नातेसंबंध आडवे आल्याने ते जरा शांत झाले म्हणता येईल. मागील पंचवार्षिकला डॉ उषाताई तनपुरे ज्यावेळी सेनेकडून विधानसभा लढत असताना चाचा उघडउघड तिकडे गेले होते, अर्थात, कर्डीलेनी पालिकेला विरोधी पॅनल लावल्याने चाचानी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती, मात्र त्यातून त्यांची विश्वासहर्ता काहीशी ढासळली होती, त्यांनंतरच्या नगरपालिका निवडणुकीत चाचासाठी मोठ्या मनाने बापूसाहेबांनी तडजोड करावी, असे काहींना वाटत होते, मात्र तसे घडले नाही, थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पुन्हा तनपुरेंच्या हातूनच चाचाना पराभव पहावा लागला, यातही रात्रीत अनेक खेळ झाले, अनेक तडजोडी झाल्या, राहुरी आणि देवळालीत पडद्याआड घडामोडी घडल्या, काही राजकीय बळी दिले गेले, याची चर्चा करण्याची गरज नाही.
निवडणुका होऊन नगरपालिका संपल्यानंतर पुन्हा लोकसभा, विधानसभा झाल्या, चाचानी परिवर्तन मंडळ आणि विकास मंडळाच्या माध्यमातून बापूसाहेब तनपुरे गटाला विरोध कायम ठेवला.आता नगरपालिका चार सहा महिन्यांवर आल्यानंतर त्यातून पुन्हा ते काहीशे सक्रिय झाले. आता नगरपालिका कारभारावर त्यांनी व कार्यकर्ते यांनी सडकून टीका केली, अनेक गँभिर आरोप केले, हे आरोप लागल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनीही 'कुंभकर्ण' या सारखे शब्द वापरून विरोधकांमधील खरा 'विरोधक' जागा केला, मात्र कुंभकर्ण बोलण्याचं धाडस कोणत्या बिभीषणाकडून आलं? हे देखील सांगण्याची गरज नाही. असो, आता आरोप प्रत्यारोपातून राजकारण चांगलेच तापणार आहे. विकास आणि परिवर्तन मंडळ देखील आता उत्तर देणार आहेच, यातून राहुरीचे गारठले राजकारण पुन्हा तापणार आहे.
आगामी निवडणुकसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात चाचा तनपुरे यांच्यासह डॉ जयंत कुलकर्णी यांच्या सारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे, विकास मंडळाचे ते आधारवड आहेत, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, एक अभ्यासू नेतृत्व आहे, याशिवाय राजेंद्र उंडे, विजय डौले हे देखील उत्तम पर्याय आहेत. मात्र यांच्यात किती एकमत किंवा मतभिन्नता आहे यावरच पुढची गणिते मांडली जाणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत