कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील हनुमान नगर भागात काही गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. या घटनेचा तीव्र शब्दा...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील हनुमान नगर भागात काही गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुंडगिरी व अवैध धंदे करणाऱ्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हंटले आहे की, शहरातील हनुमान नगर भागातील प्रमोद आरणे या गरीब कुटुंबावर हल्ला करून काही गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. अमानुषपणे घरावर जमाव घेऊन जाणे व महिलांना लोखंडी हत्यार वापरून जखमी करणे हा अत्यंत क्रूरपणा केला आहे. यावरून कायदे, पोलीस यांचा धाकच संपला की काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
अनधिकृत सावकारी करून कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा देत फोफावलेल्या गुंडगिरीमुळे शहरात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडू शकते याची संबंधितांनी गंभीर नोंद घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोपी कुणीही असो त्याला वठणीवर आणून सर्व अवैध धंदे बंद करून त्यांना हद्दपार करण्याची गरज आहे.
या घटनेचा अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी निषेध करून योग्य भूमिका घेतली आहे. परंतु स्वतःला समाजसेवक म्हणविणारे स्वयंघोषित समाजसेवक मात्र का गप्प आहेत अशी खोचक टीका अशा प्रकरणांना खतपाणी घालणाऱ्यांवर वहाडणे यांनी केली आहे. सवाल समजत नाही. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत