जी.एस: राज्याच्या राजकारणात सत्ता असो किंवा नसो पवार विरोधात विखे संघर्षाची धग कायम पेटती राहणारी आहे, त्यात सत्तेची जादूई कांडी ...
- जी.एस: राज्याच्या राजकारणात सत्ता असो किंवा नसो पवार विरोधात विखे संघर्षाची धग कायम पेटती राहणारी आहे, त्यात सत्तेची जादूई कांडी हातात असली तर विरोधकांना नामोहरम करण्याची मजा काही औरच. आता सत्ता पवारांची आहे, तर विखे मात्र विरोधात. त्यामुळे विखेंच्या ताब्यातील 'मुळा प्रवरे' नंतर आता राहुरीच्या 'तनपुरे' कारखान्यावर पवारांची नजर पडल्यास नवल वाटायला नको. खरंतर, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेकडे गहाण पडलेल्या राहुरीतील ''तनपुरे' वर बंदूक ठेऊन अजितदादा हे कट्टर विरोधक असलेल्या विखेंची राजकीय शिकार करण्यासाठी अनेक दिवसापासून सज्ज असल्याचेही बोलले जात आहे, त्यासाठी फकत आता जुळून आला तसा योग जुळत नव्हता, एवढच..!
- राजकारणात साखर कारखाना हा सत्ताकेंद्र समजला जातो, त्यामुळे सर्वच राजकीय नेते हे निवडणुका लढविण्यापूर्वी तेथील शक्तीस्थल असलेले कारखाने अगोदर ताब्यात घेण्यासाठी डावपेच टाकतात, मोठा पैसा खर्च करतात, त्यातून जनतेचा विश्वास जिंकतात आणि मग पैसा, पदे, सत्ता व साम्राज्य विस्तार हे ठरलेलं, जस की लोकसभेपुर्वीच डॉ सुजय विखे यांनी राहुरीचा तनपुरे कारखाना ताब्यात घेत अगोदर सत्ताकेंद्र तयार केले व त्या माध्यमातून प्लॅनिंग करत खासदारकी खेचून आणली, अगदी तसच..! यातून कारखान्याचे महत्व समजले असेलच, आपले माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांनीही 25 वर्ष हेच सत्ताकेंद्र वापरत आमदारकी टिकवली होती, असो, एकूणच राहुरीत वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर अगोदर कारखाना जिंका, प्रशासनाला हाताशी धरून तो ताब्यात घ्या किंवा लिलावात काढून तो विकत तरी घ्या, अशीच काहींची धारणा. हे सूत्र सर्वाना माहिती आहेच, अगदी अजितदादांना देखील, त्यामुळेच राहुरीचा तनपुरे कारखाना हा अजितदादांचा पूर्वीपासून आवडता विषय, हा कारखाना मागेही एकदा अडचणीत असताना अजित दादांनी थोडं डोकं लावलं होत, मात्र त्यावेळी माजी खा तनपुरे साहेब त्यांची त्यांना 'अपेक्षित' साथ मिळाली नव्हती, असेही बोलले जाते, त्याच रागातून तनपुरेना डावलून शिवाजीराजेना ताकद देण्याचे काम अजित दादांनी केले होते, अशीही पुष्टी त्याला जोडली जाते, अर्थात, पुढे राज्यात भाजपचे सरकार आले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आघाडीतून काँग्रेसचे कर्तेधते राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते झाले, तर अजित दादा एका कोपर्याला गेले, यात कळत नकळत विखे हे पवारांपेक्षा उजवे ठरले, त्यांनी मुख्यमंत्र्याशी मैत्री करत आपले कामे करून घेतली, त्यातील एक काम म्हणजे राहुरी कारखाना कारवाईतून वाचवतानाच भाजपचे तत्कालीन विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डीले यांना ' वर्षा' वरून सूचना करून जिल्हा बँकेची मदत घेईपर्यंत होय, त्यानंतर राहुरी कारखाना विखेनी सुरू केला, अजित दादांचा त्यावेळी काहीसा भ्रमनिरास झाला, पुढे डॉ सुजय दादा खासदार झाले, वर्ष दोन वर्षे कारखाना चालला, आता या वर्षी पुन्हा कारखाना अडचणीत सापडला, योगायोगाने आता राज्यात समीकरणे बदलली, अडगळीत पडलेले अजितदादा आता रुबाबात सत्तेत आहेत तर फडणवीसांच्या मैत्रीचा दोर पकडून भाजपात गेलेलं विखे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे अजितदादा आता ही संधी सोडणार नाहीत, हे नक्कीच आहे, कारण एक दगडात दोन शिकार करण्याची ही संधी अजित दादांना चालून आली आहे
राहुरी कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे, कामगारांचे देने बाकी आहे, मागील गाळप हंगाम सुरू करताना जिल्हा बँकेला दिलेला एकही शब्द विखेनी पाळला नाही, त्यामुळे हप्ते गेले नाहीत, कर्ज वाढले आणि आता कारवाईची वेळ येऊन ठेपली आहे, आता जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, वरती अजित दादा सत्तेत आहेत, शिवाय गेल्या वेळी मदत करणारे शिवाजी कर्डीलेही विरोधात आहेत, आशा वेळी विखेना बँक कोणतीही मदत करेल हे शक्य वाटत नाही, उलट या कारखान्यावर बँकेच्या सत्तेचा फायदा घेऊन जप्तीची कारवाई करून विखेंची लक्तरे काढण्याची संधी पवार सोडणार नाहीत, विखेंच्या ताब्यातील या कारखान्यावर ते कारवाई करतील व लिलाव करून तो विकतही घेतील, यातून अनेक दिवसांपासून हवाहवासा वाटणारा आणि देवळलीतील आपल्या आजोळशी जवळच असणारा हा कारखाना ताब्यात घेण्याची त्यांची इच्छाशक्ति पूर्ण होणार आहे, शिवाय नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार डॉ सुजय विखे यांच्या रूपाने विखे घराण्याचे वर्चस्व संपविण्यासाठी आमदार रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड प्रमाणेच 'राहुरी' ताब्यात घेऊन मोठी पक्कड निर्माण करण्यासाठी अजित दादा नगरमध्ये विशेष लक्ष घालतील, अशी अनेक धुरीनानां खात्री आहे, शिवाय, कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांनी पाय रोवले असतानाच राहुरीत नामदार प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये आमदार संग्राम जगताप,पारनेरला आमदार निलेश लंके, शेवगावचे घुले, पाथर्डीचे ढाकणे, श्रीगोंदा जगताप, असे अनेक मात्तबर दक्षिणेत असल्याने 'राहुरी' कारखाना ताब्यात आल्यास नगर दक्षिणेतील राष्ट्रवादीवरील पराभवाची परंपरा थांबण्याचा आशा आहेत, त्यामुळे पवारांबरोबरच राजकारणात धूर्त असलेल्या विखेंची खेळी काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, यातून कारखाना वाचेल का, कोण मदतीला धावून येईल, कोण लिलाव करेल, कोण विकत घेईल, या सर्व प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे...!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत