कोपरगाव/प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान 15 दिवस संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे. किराणा, भाजीपाला बंद झा...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान 15 दिवस संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे. किराणा, भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे यात शंका नाही. परंतु, कोरोनावाढीचा वेग व मृत्यूचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेऊन प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे, असे मत कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाविषयी बोलताना नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, राजकीय दबावामुळे सुरू असलेला लॉकडाऊन प्रभावी ठरलेला दिसत नाही. काही व्यवहार सुरू असल्याने लोक घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे. 100 टक्के संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय सध्या तरी दिसतो आहे. दवाखाने, औषधे, लॅब, सर्व वैद्यकीय सेवा अती आवश्यकच आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंतच दूध विक्री व्हावी. सर्वांच्याच कितीही अडचणी वाढणार असल्या तरीही सहन करावे लागणार आहे. अन्यथा कोरोनामुळे कुणाचा कधी घात होईल हे सांगताच येत नाही. सर्वसामान्य कुटुंबातील कुणी कोरोनामुळे ऍडमिट झाले तर घरदारच विकावे लागेल इतके महागडे उपचार करावे लागतात. अशावेळी त्या परिवाराला कोण आर्थिक मदत करणार. आज सर्व शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन नाहीत असे संकट आहे. यानंतर अजून भयावह परिस्थिती येऊ शकते. कारण अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारीच कोरोनामुळे जायबंदी झाले आहेत. यंत्रणाच कोसळून पडली तर काय? असा उद्विग्न सवाल करत राजकीय विचार न करता सर्वांनी एकजुटीने कोरोना विरोधात लढावे असे आवाहन केले
हॉस्पिटल, मेडिकल, लॅब, वैद्यकीय सुविधा, दूध वगळता इतर सर्व व्यवहार किमान 15 दिवस 100 टक्के बंद ठेवावेत. यामध्ये जास्त अडचणीचे होऊ नये म्हणून आठवड्यातून फक्त एक दिवस दर मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला व्यवसाय सुरू ठेवावेत. मागील वर्षाप्रमाणे अनेक समाजसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, सहकारी संस्था, नेते, राजकीय पक्ष गरजूंना फूड पॅकेट देऊन आधार देऊ शकतात, असा उपाय ही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सूचविला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत