मुंबई : वेबटीम राज्याच्या सत्तेत वरवर गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा भांड्याची आदळ आपट सुरू झाली आह...
मुंबई : वेबटीम
राज्याच्या सत्तेत वरवर गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा भांड्याची आदळ आपट सुरू झाली आहे. सेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजपविरोधात देश पातळीवरील आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच्या गांधी घराण्याऐवजी शरद पवारांकडे देण्यासाठी जणू चंग बांधला आहे, त्यातून त्यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले, त्यामुळे संतापलेल्या काँगेसचे नाना पटोलेनी आम्ही सामना वाचत नाही आणि राऊत यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नसल्याचे सांगून पोपट केला आहे, त्याचवेळी भाजपचे नेते निलेश राणे यांनीही या घरगुती भांडणाचा फायदा घेत 'शिवसेनेत हिम्मत असेल तर पटोलेना जशास तसे उत्तर द्यावे, आशा शब्दात एखाद्या शेजारणी प्रमाणे शाबूत चूल फुंकली आहे. दरम्यान, या घडामोडीत हा वाद भडकणार की नेहमी प्रमाणे शांत होणार याकडे राज्याचे विशेषतः भाजपचे डोळे लागले आहेत.
दोन दिवसांपूर्वी सेनेचे खा संजय राऊत म्हणाले होते की, देशाला एका उत्तम विरोधी आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय पातळीवरही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाही, पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होतील, असे सांगतानाच काँग्रेसला अलीकडच्या निवडणुकीत बऱ्यापैकी यश आले आहे मात्र अजून मुसंडी मारण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या, त्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाराजी देखील नाना पटोले यांनी बोलुन दाखवली आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
निलेश राणे यांनी या दुधात मिठाचा खडा टाकताना , नानांनी कचराच करून टाकला राव, आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे, असे आव्हान दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत