कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यात येते की, भारतीय हवामान विभाग, मुंबई यांचा संदेश व मा.जिल्हाधिकारी साहेब ...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यात येते की, भारतीय हवामान विभाग, मुंबई यांचा संदेश व मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यात दिनांक २८ मे २०२१ ते ३० मे २०२१ या कालावधीत काही ठिकाणी वादळी वारा ,मेघगर्जनेसह वीजा पडणे व पाऊसाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर दिनांक २९-३० मे २०२१ रोजी जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या कालावधीत वीजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खालील प्रमाणे दक्षता घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हंटले की, विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये,विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास , गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
तसेच या कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षांत घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक असून मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका.पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष: क्र: १०७७ (टोल फ्री) ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० ला संपर्क करावा.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र.१०७७ (टोल फ्री) ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.
आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किंवा तुरळक पावसामुळे शेत मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी व शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा.
पाळीव प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेले शेडची दुरुस्ती व वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडू नये यासाठी दक्षता घ्यावी.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी,जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये. मुसळधार पाऊस पडत असताना तसेच सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही पर्यटन स्थळी, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी असे आवहन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत