कोपरगांव - प्रतिनिधी कोपरगांव शहराच्या गेली ४० वर्षा पासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न माजीमंत्री श...
कोपरगांव - प्रतिनिधी
कोपरगांव शहराच्या गेली ४० वर्षा पासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, पालिकेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले आहे व करीत आहे हे कोपरगांव शहरवासीयांना माहीत आहे, गेल्या काही दिवसापासून कोल्हे कुटूंबियाविरूध्द गरळ ओकुन व्यक्तीद्वेष पसरविण्याचा पध्दतशिरपणे प्रयत्न सुरू असुन त्याबाबत आगामी काही दिवसातच शहर पाणीप्रश्न, संभाव्य होवु घातलेले पाचवे साठवण तळे, निळवंडे शिर्डी कोपरगांव पिण्यांच्या पाण्यांची योजना याबाबत जनता व महिलांच्या मनातील भावना थेट संपर्काने जाणून घेवुन त्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पटवून देवु असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहर भारतीय जनता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सेलचे प्रमुखांची चिंतन बैठक गुरूवारी संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यकर्त्यांची मते या चिंतन बैठकीत जाणून घेण्यांत आली.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यांसाठी तत्कालीन महसुलमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येसगांव परिसरात साठवण तलाव १ ते ५ साठी पालिकेला जमिनी मिळवून दिल्या, आज पर्यंत शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या ज्या काही योजनांना मंजुरी आलेल्या आहे त्या कोल्हे कुटूंबियांनी केलेल्या आहे.
एक लाख लोकसंख्येच्या जिव्हाळयाचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन सन २०१५ मध्ये भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे शिर्डी कोपरगांव २६० कोटी रूपये खर्चाची बंदिस्त पाईपलाईनची पाणी योजना मंजुर करून आणली, त्याच्या निविदा सूचनाही प्रसिद्ध झाल्या, पण सगळे श्रेय कोल्हेंना मिळू नये म्हणून विरोधकांनी न्यायालयाच्या माध्यमांतुन या योजनेस आणि विधानसभा निवडणुकीत गोबेल्स रणनितीचा अवलंब करून शहरवासियांची फसवणुक केली आणि आताही पाचव्या साठवण तळयाच्या तांत्रीक मंजुरीवरून शहराचा पाणीप्रश्न बिकट करण्यांचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.
पाचव्या साठवण तळाच्या कामाला आमचा कुठलाही विरोध नाही, पण तांत्रिक मंजुरीतील ४ व ५ क्रमांकाच्या अटी शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत अडचणीच्या आहेत. एकीकडे दारणेवर बिगर सिंचन पाण्यांचे आरक्षण ८१ टक्क्यापर्यंत वाढले आहे. आता पुन्हा पाचव्या साठवण तळ्याच्या मंजुरीसाठी दारणा धरणातून सध्यापेक्षा जास्त पाणी आरक्षण मंजूर करून घ्यावे लागणार आहे. या पाण्यासाठी एकतर वाढते आरक्षण मंजूर करून घ्यावे किंवा निळवंडे शिर्डी कोपरगांव मंजुर पाणी योजनेचे आरक्षित पाण्याचे हक्क सोडुन द्यावे अशा जाचक अटी आहेत, याचाच अर्थ कोपरगांव शहराचा पाणीप्रश्न कुठल्या न कुठल्या अडचणींत अडकवुन ठेवायचा हा पध्दतशीर प्रयत्न सध्या सुरू आहे, तेंव्हा याबाबत कोपरगांव शहर भारतीय जनता पक्षाचे पदाधिका-यांसह आपण स्वतः पुढील दहा दिवसात घरोघर नागरिकांपर्यंत संपर्क करून पाणीप्रश्नाच्या भावना जाणून घेवुन पुढील दिशा ठरविणार असल्याचे शेवटी विवेक कोल्हे म्हणाले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले, सुत्रसंचलन सुशांत खैरे यांनी केले.
प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी सर्वश्री. विजय आढाव, नारायण अग्रवाल, विनोद राक्षे, हाशिमभाई पटेल, रिपाईचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, केशव भवर, सुशांत खैरे, शरद त्रिभुवन, खालीकभाई कुरेशी, एस पी पठाण, फकिर महंमद पहिलवान, सुजल चंदनशिव, अर्जुन मोरे आदिंची भाषणे झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पराग संधान, बाळासाहेब नरोडे, दिलीप दारूणकर, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, बबलु वाणी, सर्व आजी माजी नगरसेवक, सिध्दार्थ साठे, जयेश बडवे, हरिभाउ गिरमे, नरेंद्र डंबीर, महावीर दगडे, संदिप देवकर, दिपक जपे, प्रमोद नरोडे, वैभव आढाव, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, भाजपा कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत