कोल्हार (निखिल भोसले):- आपण मानव म्हणून आपल्या जीवनात प्रगती केली खरी पण माणसाशी माणसासारखं वागायला मात्र विसरलो. राष्ट्रीय सेवा योजनांच्य...
कोल्हार (निखिल भोसले):-
आपण मानव म्हणून आपल्या जीवनात प्रगती केली खरी पण माणसाशी माणसासारखं वागायला मात्र विसरलो. राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबीरातून हे अत्युच्च संस्कार आपल्याला मिळतात. ते आयुष्यभर जपण्यासाठी नि अंगिकारण्या साठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. मुलींना सुरक्षित वाटाव यासाठी मुलांनी त्यांची जबाबदारी घ्यायला हवी तर सर्वच पुरुष विकृत मनोवृत्तीचे नसतात म्हणून तमाम पुरुष जातींकडे कलंकित भावनेने पाहणे गैर असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांनी केले.
तालुक्यातील चिंचोली येथे कोल्हार येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सरपंच गणेश हारदे तर व्यासपीठावर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, कोल्हार उपबाजार समितीचे प्रमुख संजय काळे, प्राचार्या जयश्री सिनगर, प्राचार्य सोपान शिंगोटे, पत्रकार बाळकृष्ण भोसले, संजय कोळसे, उपप्राचार्य चंद्रकांत रुद्राक्ष, मुख्याध्यापिका मिनाक्षी पाळंदे उपस्थित होते.
पूढे बोलताना डॉ. दिपाली काळे म्हणाल्या स्वच्छता ही मनातून असली तरच माणसांची मन जोडली जातात. विद्यार्थी दशेत असताना श्रमसंस्कार शिबीरे हे मुल्य संस्कार देतात. महिलांचा आदर करण्याची संस्कृती व तशी उर्जा यातून मिळते. महिला शिकल्या तरच अशी आदर्श पिढी घडते, म्हणूनच सर्वच समाजसुधारकांनी महिला शिक्षणाचा आग्रह धरला होता. सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षण व सक्षमीकरणाचा जो घाट घातला होता त्यातूनच मला इतक्या मोठ्या पदावर पोहोचण्याचा अधिकार मिळाला म्हणून समाजसुधारक जयंती पुरते नाही तर जीवनात स्विकारायला हवेत. समाजात बदल घडवायचा असेल तर अनैसर्गिक प्रवृत्तींच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. कायद्याचा धाक महत्त्वाचा आहेच मात्र बरोबरच समाजप्रबोधन करणं गरजेचं आहे नि ते या शिबींरांमधून होण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी समाजातील पुढारलेल्या घटकांनी पुढे येणे गरजेचे असून मानसिकता बदला माणूसकी मिळेल.
यासाठी नेहमी सकारात्मक आचरण ठेवण्याचा संदेशही त्यांनी दिला. इतर क्षेत्रात जाण्यापेक्षा मी पोलीस विभागात येण्याचा निर्णय घेतला. या विभागातून समाजाची काळी बाजू दिसते. ती पुसण्यासाठी तरुण पिढीकडून प्रयत्न होण्याच्या अपेक्षेवरही त्यांनी भर दिला. प्रसंगी प्राचार्या जयश्री सिनगर, प्राचार्य सोपान शिंगोटे, प्रा. संगिता धिमते, सरपंच गणेश हारदे यांची समयोचित भाषणे झाली. शिबीरातील विद्यार्थ्यांनी गत सात दिवसात केलेल्या गावातील विविध विकासकामांचा लेखाजोखा आपल्या भाषणातून मांडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत