श्रीरामपूर(वेबटीम) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभि...
श्रीरामपूर(वेबटीम)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत श्रीरामपूर महसूल मंडळातील खंडाळा येथे आयोजित शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ योजनेअंतर्गत मंडळ स्तरावर हे शिबीर घेण्यात येत आहे. शिबिराचा मुख्य उद्देश महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान बनविणे हा आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, सात-बारा नोंदी, फेरफार नोंदी, रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, कृषी, पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग आदी विभागांच्या सामाजिक लाभाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देणेहा आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी पार पडलेल्या शिबिरात रहिवासी, उत्पन्न, आणि जातीचे दाखले, प्रलंबित सात-बारा नोंदी आणि फेरफार नोंदींचे निराकरण, रेशन कार्ड वाटप तसेच नाव कमी करणे, समाविष्ट करणे, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आणि अॅग्रिस्टॅक नोंदणी, पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधनासाठी जंत नाशक व गोचीडताप निर्मुलन औषध वाटप, पशुपालकांना पशुधन दाखले वाटप, कृषी खात्यातर्फे उस खत भरण, हुमणी अळी, प्रतिबंध, घरगुती बी-बियाणे परीक्षण, महिला बचत गटांकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. यावेळी नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला आणि त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ मिळाला. विशेषतः शेतकरी आणि महिलांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी, संगायो नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहा. गटविकास अधिकारी श्री. म्हस्के, पुरवठा अधिकारी आर. बी. शिंदे, मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ, खंडाळा सरपंच छायाताई बर्डे, उपसरपंच भारती वाघमारे, सदस्य मंजुषा ढोकचौळे, माजी सरपंच भास्कर ढोकचौळे, दत्तनगरच्या सरपंच सारिका कुंकुलोळ, महसूल अधिकारी सुहास पुजारी, तलाठी राजेश घोरपडे, बाबासाहेब कदम, सुरेंद्र पवार, मनीषा पटके, टी. टी. आगळे, गोविंद खैरनार, सृजन कदम, गजानन उदारे, महसूल सहायक योगेश खंडागळे, कृषी सहायक भारती लाहोरे, कोतवाल दिलीप रंधे यांसह महसूल, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत समिती विभागातील आदी अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
तहसीलदारांचे आवाहन
“महसूल प्रशासन गावपातळीवर येऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन केले जाईल. आगामी काळात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळांमध्येकंप कॅम्प घेऊन विद्यार्थांना दाखले वितरण करण्यात येणार आहे. याकामी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आभार.” - मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर
“अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिराने महसूल प्रशासनाला अधिक जवळ आणले आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यास मदत केली. अशा शिबिरांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा लोककल्याणकारी प्रशासनाचा संकल्प प्रत्यक्षात उतरत आहे.” - छायाताई बर्डे, सरपंच, खंडाळा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत