(राहुरी : श्रेयस लोळगे) नगर-मनमाड महामार्गावरील शनिशिंगणापूर फाट्याजवळ शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रा...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
नगर-मनमाड महामार्गावरील शनिशिंगणापूर फाट्याजवळ शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात राहुरी येथील शशिकांत तुकाराम दुधाडे (वय ६५) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
प्राप्त माहितीनुसार, शशिकांत दुधाडे आणि ऋतिक गोल्हार हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना शनिशिंगणापूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, ऋतिक गोल्हार यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.या अपघातात शशिकांत दुधाडे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
शशिकांत दुधाडे हे वेलनेस कोच संकेत दुधाडे व डॉ. सुहास दुधाडे यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे राहुरी परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता राहुरी येथील गणपती घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
घटनास्थळी मान्यवरांची भेट
या अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे, डॉ. तनपुरे, राहुरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे, तसेच युवा नेते सौरभ उंडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघातस्थळी पाहणी केली आणि मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
नगर-मनमाड महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा
गेल्या आठवड्याभरात या महामार्गावर सात निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक नियमनाचा अभाव यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. विशेष म्हणजे, या मार्गाचा काही भाग पालकमंत्री व खासदार यांच्या मतदारसंघातून जात असूनही रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांची तीव्र मागणी : रस्ता तातडीने दुरुस्त करा
या भीषण घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना राबवाव्यात आणि अपघातग्रस्त ठिकाणी चेतावणी फलक लावण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत