अहिल्यानगर/वेबटीम:- नगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटी...
अहिल्यानगर/वेबटीम:-
नगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीची दखल घेतली असून प्रशासनाला जड वाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना यासंदर्भात तात्काळपावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार आज शुक्रवारी दुपारी जड वाहतूक वळविण्याबाबत परिपत्रक निघणार आहे.
नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. कारण हा मार्ग थेट शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिर व शिंगणापूरच्या श्री शनी मंदिर या दोन प्रमुख देवस्थानांना जोडतो. त्यामुळे देशभरातून लाखो भाविक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावरील खड्डे, दुरावस्था, वारंवार होणारे अपघात आणि वाढत्या जड वाहनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिक व सामाजिक संघटनांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने आवाज उठविला होता. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत जड वाहतूक या मार्गावरून बंद करून वळविण्यात यावी.
आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे वाहतूक वळविण्याबाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध करणार असून, कोणत्या मार्गाने जड वाहतूक वळविण्यात येईल याबाबतची माहिती त्यात स्पष्ट करण्यात येणार आहे. यामुळे साध्या वाहनधारक व भाविकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*अशी वाहतूक बदल*
येवला- कोपरगाव-पुणतांबा- श्रीरामपूर - नेवासा मार्गे- नगर-संभाजीनगर हायवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत