(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी उघडकीस आ...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून, प्रभाग क्रमांक ५ (संत सावता महाराज प्रभाग) मधील ४०० ते ५०० मतदारांची नावे चक्क प्रभाग ४, ६ व १२ मध्ये हलवण्यात आली आहेत. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष बाब म्हणजे, वैजनाथ मंदिर परिसर, शिवाजी चौक, विद्या मंदिर प्रशाला परिसर, मठ गल्ली, जंगम गल्ली, लोहार गल्ली, रामबुवा मंदिर परिसर, तसेच सोनार गल्ली या भागातील मतदार, जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग ५ मधून सातत्याने मतदान करत आहेत, त्यांच्या नावांचा समावेश यंदा अन्य प्रभागांमध्ये करण्यात आला आहे.
मुदत संपली, पण नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी
प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख होती. तथापि, नावांचा मोठ्या प्रमाणावर अन्य प्रभागांमध्ये समावेश झाल्याचे उशिरा लक्षात आल्याने अनेक मतदार व स्थानिक कार्यकर्ते हरकत नोंदवूच शकले नाहीत. परिणामी, नागरिकांकडून आता हरकती नोंदवण्यासाठीची मुदत वाढवण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
"अचानक आमची नावे दुसऱ्याच प्रभागात कशी?"
स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत म्हणतात, "आम्ही इथे जन्मलो, इथंच राहत आहोत आणि इथूनच वर्षानुवर्षे मतदान करतो. मग अचानक आमची नावं दुसऱ्या प्रभागात कशी गेली?" ही बाब केवळ त्रुटी नसून शंकेला जागा देणारी आहे, असा सूर नागरिकांच्या प्रतिक्रिया मांडताना दिसतो.
जबाबदारी निश्चित करा, नागरिकांची मागणी
या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण? ही चूक निवडणूक प्रशासनाची की इतर कोणत्यातरी कारणाने झालेली अदलाबदल? यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची आणि संभाव्य उमेदवारांची मागणी आहे.
लोकशाही प्रक्रियेवर विश्वास डळमळीत
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर विश्वास डळमळीत होत असल्याचे अनेक नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर, योग्य दुरुस्त्या व हरकतींसाठी मुदतवाढ देऊन नागरिकांना संधी दिली जावी, ही मागणी आता अधिकच तीव्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत