श्रीरामपूर(वेबटीम) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्य...
श्रीरामपूर(वेबटीम)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एस.आय.आर) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. १६) प्रांताधिकारी यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी बोलताना मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी राजकीय पक्षांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सावंत पाटील यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्यासोबतच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींचा (बी.एल.ए) सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या स्तरावर जास्तीत जास्त 'बीएलए'ची नियुक्ती करून प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरून एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही. एस.आय.आर पूर्वतयारीच्या अनुषंगाने २०२४ च्या मतदार यादीतील मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी 'मॅपिंग' करण्याचे श्रीरामपूर मतदारसंघाचे तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी निवडणूक आयोगाच्या ‘इसीआयनेट’ अॅूपचा वापर करून २००२ च्या मतदार यादीतील नाव कसे शोधावे, याचे थेट प्रात्यक्षिक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. या बैठकीस श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी दिपक जग्रवाल, पंचायत समितीचे एस. टी. निमसे, नायब तहसीलदार एस. के. वाकडे, महसूल सहायक ओम खुपसे, संदीप पाळंदे, नगरपरिषदेचे लिपिक सिद्धार्थ गवारे, सचिन जोगदंड, अभिजित कोळसे, अक्षय बागडे, पवन झिंगारे व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन
“मतदार यादी अधिक शुद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित आहे. 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिमेत प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी आपल्या 'बीएलए'ची नियुक्ती त्वरित करावी. जेणेकरून मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे आणि दुरुस्तीची प्रक्रिया अधिक अचूक होईल.”
— किरण सावंत पाटील (प्रांताधिकारी, श्रीरामपूर)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत