राहुरी(वेबटीम) नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुरीकडे जाणाऱ्या आकाश ह...
राहुरी(वेबटीम)
नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुरीकडे जाणाऱ्या आकाश हॉटेल ते राहुरी कॉलेज या दरम्यानचा रस्ता अवघ्या दोन महिन्यांतच उखडल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या मार्गावर काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्यावरील डांबर निघून जाऊन अनेक ठिकाणी रस्ता खराब झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत.
सध्या हा रस्ता पुन्हा उखडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून होणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार असणे अपेक्षित असताना दोन महिन्यांतच रस्ता उखडल्याने कामाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. रस्ता उखडल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः आकाश हॉटेल ते राहुरी कॉलेज परिसरातील दुकानदार, व्यावसायिक आणि रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे व्यवसायावर परिणाम होत असून ग्राहकांची संख्या घटल्याची तक्रारही व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम इतक्या कमी कालावधीत निकृष्ट का ठरले, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शासनाच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे हीच काळाची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत