राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने राहुरी फ...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात गणराज मित्र मंडळाच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणराज मित्र मंडळाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबविला. पंढरीच्या वाटेवरून जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना गरमागरम खिचडीचा प्रसाद प्रेमपूर्वक देण्यात आला. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल-विठ्ठल"च्या गजरात भक्तिमय वातावरणात हा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंदामुळे उपक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
यावेळी दादा सरोदे, भूषण नालकर, सरपंच सुधीर झांबरे, सोनू गीते, सचिन भोंगळ, लक्ष्मण कांगळे, विलास गीते, सुनील हारदे तसेच गणराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना प्रसादाचे वाटप केले.
समाजात सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने गणराज मित्र मंडळाकडून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत