देवळाली प्रवरा (वेबटीम) हातात भगवी पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले शेक...
देवळाली प्रवरा (वेबटीम)
हातात भगवी पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले शेकडो भाविक, ढोल-ताशांचा गजर आणि तोफांच्या सलामीत पुष्पहारांनी सजविलेल्या पालखी रथातून ग्रामदैवत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रविवारी सकाळी उत्साहात प्रस्थान झाले.
दिंडीचे अध्यक्ष दत्तात्रय कडू यांनी सपत्नीक श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात पादुकांची विधिवत पूजा व आरती केली. त्यानंतर महाराजांच्या पादुका मस्तकी धारण करून पालखी रथात त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवळाली प्रवरासह चिंचपूर, गोंधवणी आणि टाकळीमिया येथील भजनी मंडळांनी भजनसेवा सादर केली. पौराहित्य विजय जोशी व दिनेश जोशी यांनी केले.
यावेळी श्री. कडू म्हणाले, यंदाचे दिंडीचे १५ वे वर्ष आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची भिशी अथवा शुल्क आकारले जात नसल्यामुळे दरवर्षी वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. यंदाही पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले असून, महिला वारकऱ्यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय आहे.
दिंडीला निरोप देण्यासाठी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, गोरक्षनाथ महाराज शिंदे, वाडकर महाराज, बाजीराव खांदवे, शिवराम कडू, मंदाबाई लव्हाट, भिमा तेलोरे, देवराम कडू, चोपदार अशोक गवळी, उत्तमराव कडू, अनिल कडू, वैभव गिरमे, केदारनाथ चव्हाण, जगन्नाथ येवले, चोपदार भाले, भाऊसाहेब गडाख यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत