मुंबई(वेबटीम) राज्यातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या कायदेश...
मुंबई(वेबटीम)
राज्यातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे तसेच राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष शिवाजीआप्पा कपाळे, संचालक कडुभाऊ काळे, रवींद्र कानडे, जितेंद्र जैन, गडगे साहेब यांचा समावेश होता.
बैठकीदरम्यान नागरी सहकारी व मल्टीस्टेट पतसंस्थांसमोरील विविध अडचणी, विद्यमान कायद्यांतील त्रुटी, सभासद व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर सुधारणांबाबत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासन या क्षेत्रातील आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असून, पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी योग्य त्या कायद्यांमध्ये बदल करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र शासनाने गठित केलेल्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कायदा बदल समितीवर ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी पतसंस्था चळवळीत काका कोयटे यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांनी समितीसमोर मांडलेल्या सूचना आणि शिफारशींना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांशी संबंधित विविध विषयांवर राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी मांडलेल्या सूचनाही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. या विषयांवर केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एनसीयूआय (NCUI) च्या आगामी निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांनी आमदार संजय भेंडे यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काका कोयटे आणि राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले की, राज्यातील नागरी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांसमोरील कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच तत्परतेने धावून येतात. सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून, त्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे पतसंस्था चळवळीला मोठे बळ मिळत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील नागरी सहकारी आणि मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अधिक सक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक सहकार व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दरम्यान दिल्ली येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांना मल्टीस्टेट पतसंस्थांच्या विविध अडचणी संदर्भातील निवेदन देण्यात आले.यावेळी फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, आ . प्रवीण दरेकर, आ. संजय भेंडे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष काकासाहेब कोयटे मल्टीस्टेट फेडरेशनचे संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कपाळे, जितेंद्र जैन, रवींद्र कानडे,सुकुमार पाटील ,ज्येष्ठ विधीतज्ञ एस. एस गडगे, एम.एल.चौगुले सर शिवाजीराव ढोले उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत