संत निवृत्तीनाथ-ज्ञानोबारायांच्या भेटीचा अहिल्यानगर शहरात अनोखा संगम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत निवृत्तीनाथ-ज्ञानोबारायांच्या भेटीचा अहिल्यानगर शहरात अनोखा संगम

नगर/ नेवासे(वेबटीम)  अहिल्यानगरच्या भूमीवर रविवार १२ जुलै रोजी इतिहास नव्याने लिहिला गेला. संतपरंपरेतील दोन तेजस्वी अध्याय, दोन संतबंधू आणि ...

नगर/ नेवासे(वेबटीम)



 अहिल्यानगरच्या भूमीवर रविवार १२ जुलै रोजी इतिहास नव्याने लिहिला गेला. संतपरंपरेतील दोन तेजस्वी अध्याय, दोन संतबंधू आणि दोन पालख्या आणि पादुका एका ठिकाणी एकत्र आल्या आणि अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

खरंतर प्रथम नाशिक येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे अहिल्यानगरमध्ये आगमन झाले. त्यापाठोपाठ ज्ञानेश्वरी रूपात श्रीक्षेत्र नेवासा येथून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचे देखील नगरमध्ये आगमन झाले. 

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अहिल्यानगर शहरात दाखल झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा दरम्यान प्रशासनाच्या वतीने आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण अहिल्यानगर शहरात तोफांची सलामी देत फटाके वाजवून पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान पालखी सोहळा त्रिंबकेश्वर यांच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिर संस्थांचे ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, अहिल्यानगर शहराचे आ.संग्राम भैया जगताप यांचा श्रीफळ व निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या भेटी प्रसंगी ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास जाधव कृष्णा पिसोटे,आप्पासाहेब होन, चोपदार आरगडे महाराज, योगेश रासने अनिल शिंदे, जालिंदर गवळी, शंकर नाबदे, आशिष कावरे, अक्षय टेकाळे, सुजित पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्म पाटील शहर पोलीस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपरसे,

नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दोन्ही पालख्यांच्या आगमनानंतर पाहायला मिळाला दोन्ही भावांच्या भेटीचा अनोखा संगम. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी नेवासेत "ज्ञानेश्वरी" ग्रंथरचना केली. त्यांच्या कर्मभूमीवरून सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला. आज त्याच नगरीत, त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीशी झाली ही विलक्षण भेट. जणू साक्षात दोन्ही संत एकत्र आले आहेत, अशी अनुभूती हजारो भाविकांनी घेतली.

पालखी मार्गावर उसळलेलं भक्तिरसाचं पवित्र वातावरण, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात गुंजणारे "ज्ञानोबा-तुकाराम" या सर्वांनी वातावरणाला अधिकच पावन केले. वारकऱ्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत, "माऊली-माऊली" च्या गजरात ही ऐतिहासिक भेट घडून आली.

या भेटीने भक्तांचे हृदय भरून आले. कारण ही होती फक्त दोन पालख्यांची नव्हे, तर दोन संतबंधूंच्या आत्म्यांची पवित्र भेट होती. इतिहासाच्या पानांवर कायमचा कोरला जाणारा हा सोहळा, संतांच्या विचारांनी समाजाला जोडणारा आणि भक्तीची अखंड परंपरा अधिक दृढ करणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत