कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवाळी सणामुळे सर्वत्र गर्दी वाढत असून सुभद्रानगर परिसरात...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवाळी सणामुळे सर्वत्र गर्दी वाढत असून सुभद्रानगर परिसरात दिवसाढवळ्या महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले जाण्याच्या घटना घडत असून शहर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजली अनिरुद्ध काळे यांनी केली आहे.
कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरात दोन महिन्यापूर्वी घराच्या खिडकीतून चोरट्यांनी डल्ला मारला असून त्या चोरीचा आजवर तपास लागलेला नाही. अशातच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांची भर पडली आहे. सध्या दिवाळी सणाची धामधूम सूरु असून महिला भगिनी मोठ्याप्रमाणावर बाहेर गावी जात आहे. दिवाळीचा सण असल्यामुळे महिला भगिनी सोन्याचे अलंकार परिधान करीत आहे. बाजारपेठेत व रस्त्यावर होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले जात आहे.
सोमवार (दि.१६) रोजी भाऊबीजेच्या दिवशी एका महिलेच्या अंगावरील ५ तोळ्याचे गंठन दुचाकीवर आलेल्या भुरट्या चोरांनी लंपास केले आहे. यामध्ये या महिलेला दुखापत देखील झाली असून सुदैवाने जीव वाचला आहे. काही दिवसापासून होत असलेल्या चोऱ्यांचा पोलीस प्रशासन तपास न लावू शकल्यामुळे अशा भुरट्या चोरांचे मनोधैर्य वाढले असून महिलांच्या अंगावरील दागिने लुटले जात असल्याच्या प्रकारामुळे महिला भगिनींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा यापुढे घडू नये यासाठी कोपरगाव शहर व सुभद्रानगर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सौ. अंजली अनिरुद्ध काळे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत