जालनाः केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असल्याच...
जालनाःराजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
'हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?' असा सवाल दानवेंनी यावेळा केला.
'हा बाहेरच्या देशानं रचलेला कट आहे. शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहे. आपल्या देशआतील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,' असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व भाजपचे स्थानिक नेते केशव घोळके यांनीही शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन आणि पाकिस्तानसोबत जोडला होता. तसंच, शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून फंडिंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत