कोपरगाव प्रतिनिधी मागील वर्षी जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाविकास सरकारच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्या...
कोपरगाव प्रतिनिधी
मागील वर्षी जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाविकास सरकारच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात केलेल्या सर्व प्रकारच्या उपाय योजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे बहुतांशी नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे सोडून तोंडावरचा मास्क देखील काढून टाकल्यामुळे मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून कोपरगाव तालुक्यात देखील दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२२) रोजी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेवून मार्गदर्शन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरिकांना आवाहन करतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मागील माहिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. तसेच देशात,राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण देखील सुरु करण्यात आल्यामुळे कोरोना आजाराच्या बाबतीत नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी होवून कोरोना संपल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचा नागरिकांना विसर पडला होता. त्यामुळे चेहऱ्याला मास्क, सामाजिक अंतर व साबण अथवा हँडसॅनिटायझरने आपले हात वारंवार धुण्याचा देखील नागरिकांना विसर पडला होता. त्या निष्काळजीपणामुळे रोडावलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यापुढे लॉकडाऊन करणे परवडणारे नाही त्याचे दूरगामी परिणाम होवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेवून कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यापूर्वी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य नागरिकांच्या जास्तीत जास्त तपासण्या कराव्या. कोविड केअर सेंटर सुरु करणे, कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देणे त्याप्रमाणे नागरिकांचे आरोग्य बाधित राहण्यासाठी परिस्थितीनुसार प्रशासन जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत