कोपरगाव/प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ दौर्यावर आले आहेत. या...
कोपरगाव/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ दौर्यावर आले आहेत. यामध्ये त्यांनी कोपरगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करत कोरोनाचा लढा सर्वांनी एकजुटीने यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या दौर्यात येथील कृष्णाई मंगल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीस पालकमंत्री मुश्रीफ यांच्या समवेत खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, पोलीस निरीक्षक शहर वासुदेव देसले, तालुका दौलत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुशांत घोडके, नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी साईबाबा तपोभूमी येथे उभारलेल्या 500 खाटांच्या कोविड सेंटरला आणि एसएसजीएम येथील कोविड सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले. तर आमदार काळे यांनी प्राणवायू, रेमडेसिवीर इंजेक्शन, कर्मचारी, रुग्णवाहिका आणि कोरोना तपासणीचा अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी केली. तसेच माजी आमदार कोल्हे यांनी एचआरसीटी स्कॅनसाठी वेळ आणि केंद्रे वाढवून द्यावी व ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष वहाडणे यांनी एकजुटीने आणि राजकीय हेवेदावे विसरुन कोरोनात काम करण्याचे आवाहन करण्याबरोबर कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, प्रशासन कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. दोन दिवसांत रेमडेसिवीरचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत