कोपरगाव प्रतिनिधी:- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटात...
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटात देखील निधी कमी पडू दिला नाही. २०२४ पर्यत जिरायती भागातील गावात टेल टू हेड पाणी पोहोचलेच पाहिजे असा महाविकास आघाडी सरकारने निर्धार केला आहे. त्यामुळे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ३६५ कोटींची तरतूद २०२२/२३ या आर्थिक वर्षात निळवंडे कालव्यांसाठी करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पावर यांनी केली आहे. त्यामुळे निश्चितपणे निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळणार असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
नगर जिल्ह्यातील कोपरगाव,अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती न मिळाल्यामुळे निळवंडे कालव्यांची कामे रेंगाळली होती. त्यामुळे मागील काही दशकापासून या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे निळवंडेच्या पाण्याची आस लावून बसले होते. परंतु २०१९ ला राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यातून निळवंडे कालव्यांना मागील दोन वर्षात कोरोनाचे संकट असतांना देखील जवळपास ४९१ कोटी निधी मिळाला असून निळवंडे कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील नागरिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.
परंतु २०२४ पर्यत या सर्व जिरायती भागातील गावांना टेल टू हेड पाणी देण्याचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडी सरकारने २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटी रुपयांच्या निधीची तरतदू करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केली आहे. यामध्ये निळवंडे कालव्यांसाठी ३६५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली हि निळवंडे कालवा लाभ क्षेत्रातील १८२ गावातील शेतकरी व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी निळवंडे कालव्यांसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद व ज्याप्रक्रारे महाविकास आघाडी सरकार सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ते पाहता अनेक वर्षापासून निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. २०२४ पर्यंत नक्कीच निळवंडे कालवे वाहतील व १८२ गावातील परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे तो दिवस दूर नाही असे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत