कोपरगाव प्रतिनिधी:- गलथान कारभार कशाला म्हणतात हे मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विजेच्या प्रश्नावरून दिसून येते. त्या पाच वर्षात तब्बल ४६...
कोपरगाव प्रतिनिधी:-
गलथान कारभार कशाला म्हणतात हे मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विजेच्या प्रश्नावरून दिसून येते. त्या पाच वर्षात तब्बल ४६४ विजरोहित्र ओव्हरलोड झाले आहेत हे मतदार संघातील जनतेला ना.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून समजले आहे. यावरून माजी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कार्याची महती कळते. एका जागरूक नागरिकाने या जनता दरबारात ४६४ रोहित्र ओव्हरलोड करून ठेवल्याचा भांडाफोड केल्यामुळे माजी लोकप्रतिनिधींना मिरच्या झोंबल्या आहेत अशी टीका कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कारभारी आगवण यांनी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.
ना.आशुतोष काळे यांना बदनाम करण्यासाठीच भाजपच्या तालावर नाचून महावितरणचे कर्मचारी काम करीत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोमवार (दि.११) रोजी ना.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या जनता दरबारात केला होता. त्या आरोपाच्या माजी लोकप्रतिनिधींना चांगल्याच मिरच्या झोंबल्याचे दिसून येत आहे. ना.आशुतोष काळे यांचे प्रशासकीय पातळीवर चांगल्याप्रकारचे काम चालू आहे. ढिसाळ काम करणाऱ्या एकही प्रशासकीय अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याची ना.आशुतोष काळेंची भूमिका नाही.
जनता दरबारात कुणीही जागरूक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले तर कुणीही ते आपल्यावर घेत नाहीत मात्र ज्यांचा या प्रश्नाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग आहे त्यांना मात्र मिरच्या या झोंबणारच. त्यांच्यामुळेच मागील पाच वर्षात ४६४ विजरोहित्र ओव्हरलोड झाले आहेत. त्यापैकी माजी लोकप्रतिनिधींनी किती वीजरोहित्र मिळविले याचा खुलासा कधी केला नाही. आपल्या कार्यकाळात विद्यमान ऊर्जामंत्र्यांना आणून भूमिगत विजवाहिन्यांचे भूमिपूजन केले. त्या वीजवाहिन्या कायमच्याच भूमिगत झाल्या की काय? याचा देखील खुलासा माजी लोकप्रतिनिधींनी केला नाही. यावरून निष्क्रिय कोण आहेत? याचे माजी लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करावे असे कारभारी आगवण यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत