कोपरगाव(प्रतिनिधी) कोल्हेंचे शेतकऱ्यांविषयी असलेले पुतना मावशीचे प्रेम ज्यावेळी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्यव्यापी शेतकरी संप ...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोल्हेंचे शेतकऱ्यांविषयी असलेले पुतना मावशीचे प्रेम ज्यावेळी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्यव्यापी शेतकरी संप मोडला त्यावेळी कोपरगाव तालुका, जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्याने पाहिले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेले आंदोलन बोलायचे एक आणि करायचे एक अशा पद्धतीने करून जनतेला वेड्यात काढायचे काम त्यांनी आजवर केले आहे. त्यामुळे जनआक्रोश आंदोलनाचा हा देखावा असून कोल्हेंचे खायचे दात, वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांनी जनआक्रोश आंदोलनावर केली आहे.
कोपरगाव येथे माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या जनआक्रोश आंदोलनाचा कारभारी आगवन यांनी खरपूस समाचार घेतांना पुढे असे म्हटले आहे की, कोल्हेंनी केलेल्या खडा आंदोलनाचा उलटा ईतिहास सांगून जनतेला वेड्यात काढले जात आहे. एकीकडे खडा आंदोलन करायचे, रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल अशी भाषा करायची आणि दुसरीकडे स्वत:च धरणाचे दरवाजे उघडायला जायचे असा दुटप्पीपणा फक्त कोल्हेंनाच जमला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनावर नागरिकांना कधीच विश्वास नसतो. कार्यकर्त्यांना जनआक्रोश आंदोलनाला बोलावून ग्रामपंचायत आणि सोसायट्यांचे विषय घ्यायचे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी नाही याचे रडगाणे गायचे यावरून हा आक्रोश कशासाठी होता हे सर्वसामान्य जनतेने ओळखले आहे.
जनआक्रोश आंदोलनात पाट पाण्याच्या प्रश्नावर दिशाभूल करणाऱ्या कोल्हेंनी मागील पाच वर्ष कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रातून मुबईला घेतली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंतच तर कुठे त्याच्या आतच पाणी देवून शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे कोल्हेंना आवर्तनाच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला जनतेने का नाकारले व तुमच्याकडे सत्ता का नाही याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला कारभारी आगवन यांनी दिला आहे.
आजही भर उन्हाळ्यात कालव्यांना आवर्तन सूरु आहे हे जनआक्रोश आंदोलनात माजी आमदारांनी कबूल केले आहे तरीदेखील आवर्तनाचे प्रश्नावर तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करतात हे जनता जाणून आहे. जनआक्रोश आंदोलन करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का? याचा जरा खाजगीत कानोसा घ्या. बालहट्ट पुरविण्यासाठी कार्यकर्ते नाईलाजास्तव सहभागी झाले होते का? याचीही माहिती घ्या.त्यावेळी तुम्हाला समजेल की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी तुमच्याकडे का नाही. त्यामुळे जर तुम्हाला खरोखर जनतेची एवढीच काळजी असेल तर महागाईच्या प्रश्नावर आक्रोश करा मात्र बालहट्टापायी बालीशपणा करू नका असे शेवटी कारभारी आगवन यांनी म्हटले आहे.
हा तर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा आक्रोश..............
मागील अडीच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघात प्रतिकूल परिस्थितीत विकासाचे बहुतांश प्रश्न मार्गी लावण्यात श्री साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. जनतेला विकास दिसत आहे जो त्यांना २०१९ पूर्वी दिसत नव्हता त्यामुळे जनता समाधानी आहे. मात्र कुठेतरी आपलं अस्तित्व लोप पावते की काय? अशी विरोधकांना मनात भीती वाटत असल्यामुळे जनआक्रोश आंदोलनाची नौटंकी करण्यात आली असून हे जनआक्रोश आंदोलन नसून हा तर राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठीचा आक्रोश आहे– कारभारी आगवन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत