कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पाच न...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे तसेच ५ नंबर साठवन तलाव मोठा असल्यामुळे या साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देखील मिळविली असून ५ नंबर साठवण तलावाच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र पडद्यामागून विरोध करणाऱ्या कोल्हे गटाने आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका दाखल केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व नगरसेवक विरेन बोरावके यांच्या नावे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सोमवार (दि.०२) रोजी सुनावणी होवून दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून ५ नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण रद्द करावे ही विरोधकांची मागणी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चार साठवण तलाव शहराची तहान भागविण्यासाठी असमर्थ ठरत होते. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेवून नामदार आशुतोष काळे यांनी पाणी प्रश्न सोडविण्याची विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १३१.२४ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे. त्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.मात्र शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यास आपले पाण्यावर चालणारे राजकारण संपुष्टात येण्याच्या भितीपोटी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत कोल्हे गटाने न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.त्या याचिकेवर सुनावणी होवून औरंगाबाद खंडपीठाने या याचिका कर्त्यांनी केलेली मागणी फेटाळली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला आडवे येणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.याकामी ॲडव्होकेट शाम पाटील, ॲडव्होकेट मिलिंद पाटील, अडव्होकेट व्ही. डी.साळुंके ॲडव्होकेट आर.एल. कुटे,ॲडव्होकेट ए.बी.काळे व ॲडव्होकेट डी.आर.काळे यांनी काम पाहिले.
मोठ्या अथक प्रयत्नांने शहरातील जनतेच्या आशीर्वादाने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात ना.आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्यासाठी विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखवून सहकार्य करावे. मात्र आडवे येवून शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप कोल्हेनी आपल्या माथी मारून घेवू नये.
विरेन बोरावके

कोणत्याही टिप्पण्या नाहीत