नगर ः वेबटीम यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. अनेकांशी लागवडी, पेरण्यासाठी रानं तयार करून ठेवली आहे. आत...
नगर ः वेबटीम
यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. अनेकांशी लागवडी, पेरण्यासाठी रानं तयार करून ठेवली आहे. आता सर्वांना पहिल्या पावसाची प्रतीक्षा असतानाच 8 ते 10 जुन दरम्यान नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे शेतकर्यांच्या मशागतींना आणखी वेग येणार आहे.राज्यात 8 जूनपासून वरूणराजाचे आगमन होणार आहे. साधारणतः 8 ते 15 जून या कालावधीत दररोज भाग बदलत पावसाची हजेरी लागणार आहे. यातील 8, 9 आणि 10 जुन रोजी नगर जिल्ह्यात दमदार पाऊस पडणार आहे.
मान्सूनपूर्वी रोहीणी नक्षत्र कोरडे गेले आहे. आता 8 जुनपासून मृग नक्षत्र हे गाढव वाहनावर येणार आहे. 22 जून ते 5 जुलै या कालावधीत मेंढा वाहनावर येणारे आद्रा बरसणार आहेत. 6 ते 19 जुलै या कालावधीत उंदीर वाहनावरून पुनर्वसुचे आगमन होणार आहे. 20 जुलै ते 2 ऑगस्ट कोल्हा वाहन घेऊन पुष्प नक्षत्रात वरूणराजाची हजेरी लागलेली दिसेल. 3 ते 16 ऑगस्ट मोराप्रमाणे आश्लेषा बरसेल, त्यानंतर 17 ते 29 ऑगस्ट अश्वावर येणारा मघांचा धोधो पाऊस पडेल. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत मेंढा वाहनावर पुर्वा, 13 ते 26 सप्टेंबर गाढव वाहनावरून उत्तरा लागणार आहे. आणि 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हा वाहन घेऊन आलेल्या हस्त नक्षत्राचा पाऊस पडणार आहे.
दरम्यान, यंदा खरीपात कपाशी लागवडी, सोयाबीन पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहे. आता पहिल्याच पावसाच्या ओलीवर पेरण्यांचा श्रीगणेशा होणार आहे. हवामान अभ्यासक डख यांनी नगरला बुधवार दि. 8 पासून पाऊस सांगितल्याने शेतकर्यांच्याही जीवात जीव आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत