आंबी राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने बंधाऱ्यासह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव...
आंबी
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने बंधाऱ्यासह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर बंधाऱ्यावरून छोट्या-मोठ्या वाहनांसह शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात. मात्र बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचे गंगापूरचे लोकनियुक्त सरपंच सतिश खांडके यांनी सांगितले.
अगोदरच हा पूल जुना व कमकुवत झाला आहे. बंधाऱ्याला अनेक ठिकाणी गळतीही लागली आहे. गंगापूर व मांडवे व पंचक्रोशीतील नागरिक दैनंदिन दळणवळणासाठी याच बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करत असतात. भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी आठ लक्ष रूपयांची मंजुरी मिळाली. मात्र रक्कम अपुरी असल्याने कोणीही ठेकेदार या कामासाठी धजावत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने हे काम डॉ. विखे पाटील कारखान्याकडे सोपवले आहे. कारखान्याच्या यंत्रणेने समक्ष येऊन पुलाची पाहणी केली आहे. जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली आणि त्यात एखाद्या निष्पापाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे लवकरात लवकर या पुलावरील भगदाड व खड्डे बुजवावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सदर पूल वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचे सरपंच खांडके यांनी सांगितले.
“पिंपळगाव फुणगी येथून फत्त्याबाद येथे हायस्कूलमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही विद्यार्थिनी शाळेत जात असताना पुलावरील खड्यांचा अंदाज न आल्यामुळे पडल्या. दैव बलवत्तर म्हणून पुलाला कठडे असल्याने त्या चिमुकल्या बचावल्या. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीणे दिली.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत