कोपरगाव प्रतिनिधी - मागील पाच वर्ष नगरपालिकेची सत्ता असतांना देखील कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे श्री साईबाबा...
कोपरगाव प्रतिनिधी -
मागील पाच वर्ष नगरपालिकेची सत्ता असतांना देखील कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आहे. या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला सूचना देऊन या समस्या तातडीने सोडवण्यासाठी ना. आशुतोष काळे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील पाच वर्ष प्रभागाचा विकास करू न शकलेल्या विरोधकांना मात्र हे सहन होत नाही व नागरिकांच्या अडचणी सुटत आहेत याचे त्यांना दुःख वाटत आहे. त्यामुळे विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपयश दुसऱ्यावर लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. जर मागील पाच वर्ष त्यांनी प्रभागात विकासकामे केली असती तर प्रभागाची समस्या नगरी झाली नसती अशी उपरोधिक टीका कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली आहे.
ना. आशुतोष काळे कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अडचणी प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत जाणून घेत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सूचना देऊन ते प्रश्न सोडवले जात आहे त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व समस्या मांडत आहेत. नुकत्याच त्यांनी जुन्या प्रभाग क्रमांक चार (नवीन प्रभाग पाच) मध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतांना नागरिकांनी त्यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकपणे त्या प्रभागास समस्या नगरी असे संबोधायचे का? असा प्रश्न उपस्थित असलेल्या प्रभागातील नागरिकांना केला. त्याचे त्या प्रभागातील कोल्हे गटाचे सत्ताधारी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या चांगलेच वर्मी लागले आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा सुनील गंगुले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ना.आशुतोष काळे यांच्या रूपाने संपूर्ण मतदार संघाला कामसू आमदार लाभला आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव चांगल्या प्रकारे असून त्यांनी प्रभाग ४ ला १ कोटी आणि संपूर्ण कोपरगाव शहरासाठी २६८ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यांच्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा शहराचा पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. त्याहीपुढे जावून प्रत्येक प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेवून ते त्या सोडवत आहेत व आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. त्यामुळे भविष्यात आपले काही खरे नाही याची भीती विरोधकांना वाटत असल्यामुळे उदिग्न होवून आपल्या सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त करीत आहे. ज्या वाजे कुटंबाकडे जुन्या प्रभाग ४ ची मागील २० वर्षापासून सत्ता आहे त्या प्रभागाची आज समस्या नगरी होवून बसली आहे त्यांना ३ वर्षाचा हिशोब मागायचा अधिकार आहे का? हे त्यांनी अगोदर आपल्या मनाला विचारले पाहिजे. आज जरी त्यांना मनातून पश्चाताप होत असला तरी आता उपयोग होणार नाही. जनता तुम्हाला कंटाळलेली आहे जनतेने २० वर्ष खूप सोसलं आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता मागील अडीच वर्षात विकासाच्या बाबतीत कोपरगावमध्ये झालेला बदल अनुभवत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकेत सत्ता बदल अटळ असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत