राहुरी/वेबटीम:- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी मध्ये नागरी सत्कार करण्यात आला होता . यावेळी खा. सुजय विखे यांनी आ.प्राजक...
राहुरी/वेबटीम:-
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी मध्ये नागरी सत्कार करण्यात आला होता . यावेळी खा. सुजय विखे यांनी आ.प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.त्या टीकेला आ.तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे.
नगर मनमाड रस्त्याचा प्रश्नाला बगल देत टक्केवारीचा आरोप खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. दुसर्यांवर गुन्हेगारी व दडपशाहीचा आरोप करण्यापूर्वी पक्षाचे दडपण घेऊन ज्यांना आमदार करण्याची शपथ घेत आहात त्यांच्या इतिहासाचे वाचन करावे. शासकीय प्रशासनाचा नेहमीच जनमसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापर केला आहे. कधीही राजकीय वापर केला नसल्याचा खुलासा आ. तनपुरेंनी केला आहे.
आ. तनपुरे म्हणाले की, मी अडीच वर्षाच्या कालखंडात कधीही कोणावर अन्याय केला नाही. प्रशासनाचा कधी गैरवापर केला नाही. त्याउलट सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकार्यांना व कर्मचार्यांशी वेळोवेळी चर्चा साधत योग्य तेच निर्णय घेतले. खा. डॉ. विखे यांनी बेतालपणे आरोप करीत आहेत. गुन्हेगारी, अधिकार्यांचा गैपवापर असे आरोप करताना तुम्ही शेजारीच बसलेल्या माजी लोकप्रतिनिधींचा इतिहास पाहणे गरजेचे होते. खा. डॉ. विखे यांनी राजकारणामध्ये वडीलधारी व्यक्तींचा मान राखणे गरजेचे होते. खासदार डॉ. विखे यांनी माझ्यावर टिका करणे हे धोरणात्मक होते. परंतु वडीलधार्या व्यक्तींचा मान सन्मान विसरून खा. विखे यांनी माझे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यावर टिका केल्याचे शल्य वाटत आहे. आम्ही कधीही शासकीय अधिकार्यांचा वापर राजकीय ताकद दाखविण्यासाठी केला नाही. त्याउलट सत्काराचा कार्यक्रम हा कार्यकर्त्यांचा असताना तुम्ही संस्थेतील अधिकारी, कर्मचार्यांसह शासकीय अधिकार्यांनाही वेठीस धरून खुर्च्यांवर बसवून ठेवले. अधिक संख्या दाखविण्यासाठी कोणत्या संस्थेचे किती अधिकारी व कर्मचारी आपण सत्कारासाठी बसवून ठेवले याची माहिती आम्हाला आहेे खा. विखे यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.
माजी आमदार कर्डिले यांनी आपल्या कार्यकाळात एकही पाणी योजना सुरू केली नाही. दहा वर्षामध्ये एकही पाणी योजना मंजूर केलेली नसताना आम्ही केवळ अडीच वर्षातच मिरी तिसगाव, बुर्हाणनगर, वांबोरी व ब्राम्हणी पाणी योजनांसह अनेक पाणी योजनांना कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला. दहा वर्ष लोकांना झुलवत ठेवणार्या माजी आमदार कर्डिले यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे.
त्यामुळे राहुरीत खा. डॉ. विखे व माजी आमदार कर्डिले यांनी खोटे व बिनबुडाचे आरोप केले असल्याचे आ. तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तर राजकारणातून थांबा घेईल
नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खा. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे सोडून टक्केवारी मागितल्याचे आरोप सुरू केले आहे. मी एक पैसाही घेतल्याचे सिद्ध केल्यास तात्काळ राजकारणातून थांबा घेईल. खोटे आरोप करण्यापेक्षा केंद्राकडून नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत