राहुरी/वेबटीम:- गेल्या महिनांभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसाने खरीप पिकासह, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
राहुरी/वेबटीम:-
गेल्या महिनांभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसाने खरीप पिकासह, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर खरीप हंगामात काढणीला आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन नगर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे राहुरी तालुकाध्यक्ष शरद म्हसे यांनी केले आहे. निर्सगाप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असे म्हसे यांनी म्हंटले आहे.
'आवाज जनते'शी बोलताना शरद म्हसे म्हणाले की, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी पेक्षाही जास्त पाऊस सुरू असून त्यामुळे तूर, कपाशी, मूग, तूर, सोयाबीन, यासह ऊस व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीचा खरिपाचा हंगाम जादा पावसामुळे वाया गेला व बाजरी, सोयाबीन काढणीच्या हंगाम तसेच कापूस वेचण्याची सुरुवातही झाली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला परतीच्या पाऊस उघडीप देत नाही परिणामी बियाणे, खते व मशागतीवर प्रचंड खर्च होऊन शेतकर्यांच्या हाती काही उत्पन्न येणार नसल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
सातत्याने जमिनीत पाणी असल्याने जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी रब्बी हंगामातील पिके घेता येतील की नाही याचीही साशंकता आहे, अशा परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी तातडीने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे तातडीने पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, राज्य सरकारने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला असल्याने सरकारने तात्काळ मदत करून शेतकऱ्यास आधार द्यावा असे शरद म्हसे यांनी म्हंटले आहे.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत