श्री क्षेत्र ताहाराबाद येथे संत कवी महिपती महाराज ५७ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री क्षेत्र ताहाराबाद येथे संत कवी महिपती महाराज ५७ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

  ताहाराबाद (वार्ताहर)  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत श्री संत कवी महिपती महाराजांचा ५७ वा फि...

 ताहाराबाद (वार्ताहर) 



लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत श्री संत कवी महिपती महाराजांचा ५७ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. टाळ- मृदुंगाचा गजर आणि जय जय महिपती, नमो महिपतीच्या नामघोषाने प्रतिपंढरी धन्य झाली!

        संत महिपतींच्या पदस्पर्शाने अभिमंत्रित झालेल्या व हिरवाईने नटलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबादच्या माळरानावर जमलेली भाविकांची मांदियाळी, अखंडपणे सुरू असलेला हरिनामाचा आणि टाळ-मृदुंगाचा गजर, वाऱ्यांच्या लहरीबरोबर डोलणाऱ्या भगव्या पताका, भक्तीविजय ग्रंथाचे पारायण,संपूर्ण राहुरी तालुका परिक्रमा व संत महिपती पादुका- रथ दर्शन सोहळा, परिक्रमावाशीयांचे भाविकांनी उस्फूर्तपणे केलेले स्वागत तद्नंतर मंत्रमुग्ध वातावरणात काल्याच्या कीर्तनात तल्लीन झालेले भाविक आणि दहीहंडी फोडल्यानंतर प्रसाद घेऊन तृप्त झालेला वैष्णवांचा मेळा, या पार्श्वभूमीवर संत महिपतींचा ५७ व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला. चैत्र महिन्याच्या रखरखीत उन्हात- श्रवणभक्तीत आकंठ बुडालेले भाविंक भक्तीरसात न्हाऊन निघाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले.

     श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे हा सोहळा संपन्न झाला. गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या ह्या सोहळ्याची सांगता मोठ्या हर्षउल्हासात झाली. प्रथमच राहुरी तालुक्याची परिक्रमा करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात संत महिपती हस्तलिखित भक्तीविजय ग्रंथाच्या पारायणाचा स्वर दुमदुमला!तालुक्यातील प्रत्येक गावात भाविकांनी महिपतींच्या पादुका-रथाचे भव्य स्वागत केले. महिपतींच्या रथ प्रस्थान पासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत पर्जन्यराजानेही हजेरी लावली. ऊन- वारा -पाऊस यामध्येच भाविकांची परिक्रमा झाली. देवस्थानच्यावतीने व ग्रामस्थांच्यावतीने परिक्रमावाशीयांचे भव्य स्वागत करण्यात आले.


       सोहळ्याची सांगता, महंत बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. काल्याच्या कीर्तनात भाविकांना उपदेश करताना कांबळे महाराज म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. परंतु ताहाराबाद क्षेत्रात ग्रामस्थांची माझ्यावर अपार निष्ठा आहे. ग्रामस्थांमुळेच मी धार्मिक कार्य सिद्धीस नेऊ शकतो. एकल्याचा नवे हा खेळ |म्हणोनी मेळ मिळविला||सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला. महिपतींचा आशीर्वाद असल्यामुळे कोणतेही कार्य सिद्धीस जाते. महिपतींच्या मंदिराचा कळस झाला तरच आपल्या जीवनाचा कळस होईल, अशी भावनिक साद महाराजांनी घातली. त्यामुळे महिपतींच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी भाविकांनी हात पुढे केले. महिपती महाराज तालुक्याचे- जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण जगाचे आहेत. महिपतींनी राज्य व राज्याबाहेरील २८४ संतांची चरित्रे लिहिली आहे. हे अनंत उपकार महाराजांनी केलेले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, अशी अपेक्षा कांबळे महाराजांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीचा महिमा अगाध आहे. जगातील सर्व संस्कृतींमध्ये हिंदू संस्कृती महान असून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करू नका, भारतीय संस्कृतीची जोपासना करून तरुणांनी आपले आचार,विचार,  विहार, आहार व उच्चार आपल्या संस्कृतीनुसारच करण्याचे आवाहन त्यांनी केले. कांबळे महाराज म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीची कास धरू नका. त्याचा परिणाम युवापिढीवर होऊन,हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. संपत्ती पेक्षा संस्कृती महत्त्वाची आहे. संस्कृतीनुसारच आपली वेशभूषा असली पाहिजे. मोबाईलमुळे संस्कृतीवर संकट आहे. भावीपिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन-नियोजन होणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराजांनी केले.

    कांबळे महाराजांनी काल्याच्या किर्तनप्रसंगी, भगवंताच्या विविध लीला सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. काल्याच्या  कीर्तनानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे , लोकनियुक्त सरपंच निवृत्ती घनदाट,  ताहाराबाद सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, नाना महाराज गागरे, अण्णा महाराज गागरे, व्यवस्थापकीय विश्वस्त बाबासाहेब महाराज वाळुंज, बाळासाहेब मुसमाडे, सुभाष पाटील, अशोक किनकर, बापूसाहेब गागरे ,कांता पाटील कदम राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर माने, मा. सरपंच नारायण झावरे, बाळासाहेब हारदे,विश्वनाथ किनकर, विजूअण्णा झावरे,वेणूनाथ औटी,देवस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे,ग्रामस्थ व भाविंक आदीं उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत