कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव पंचायत समितीची काही दिवसांपूर्वीच निवडणूक होऊन पंचायत समितीमध्ये काळे, कोल्हे, परजणे व औताडे यांच्या सहमती एक्सप्रेस...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव पंचायत समितीची काही दिवसांपूर्वीच निवडणूक होऊन पंचायत समितीमध्ये काळे, कोल्हे, परजणे व औताडे यांच्या सहमती एक्सप्रेसची सत्ता आहे. त्यामुळे विकास काम करताना कोणाचा विरोध असणे शक्य नाही. त्यामुळे आता नूतन संचालक मंडळाने व पंचायत समितीच्या प्रशासनाने बाजार समिती अंतर्गत असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशी मागणी कोपरगाव तालुका व शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने काल कोपरगाव बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन करण्यात आली.
सदर मागणीचे निवेदन बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम व सचिव नानासाहेब रणशूर यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहर प्रमुख सनी वाघ, ग्राहक संरक्षण प्रमुख रवी कथले, तालुका समन्वयक मुन्नाभाई मनसुरे, माजी शहरप्रमुख प्रमुख भरत मोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, तालुका युवा सेना प्रमुख सिद्धार्थ शेळके, शहर प्रमुख नितीश बोरुडे, उपशहर प्रमुख बाळाजी गोर्डे, अमोल शेलार, आकाश कानडे, विभाग प्रमुख जाफर शेख ,वाशिम चोपदार, अल्ताफ शेख ,संदीप आयनोर, प्रशांत शेलार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की बाजार समितीमध्ये असलेल्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे, सुलभ शौचालय दुरुस्ती किंवा नव्याने उभारणे, व्यापारी शेतकरी व हमाल यांच्या हितासाठी नवीन धोरण अमलात आणणे, बैल बाजार ,चामडा बाजार ,फळ भाजीपाला लिलाव अदी ठिकाणी शेडसह सार्वजनिक शौचालय उभारणे, रात्र पाळीसाठी कर्तव्यदक्ष सिक्युरिटी गार्ड नेमणे, विजेची व्यवस्था करणे, शेतकऱ्यांसाठी स्वच्छ व सुंदर हॉटेल निर्माण करून चवदार नाष्ट्याची सोय करणे, बैल बाजाराचे टेंडर काढून त्याचा कायदेशीर ठेका देणे, खरेदी विक्रीसाठी आलेल्या जनावरांना उतरण्यासाठी कठडा किंवा रॅम करणे, जनावरांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे, भुसार मालाच्या कार्यक्षेत्रात सर्व व्यापाऱ्यांना समान जागा वाटप करण्यात यावी, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना आदरपूर्वक वागणूक देऊन शेतीमालाच्या लिलावाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, कांदा लिलावासाठी स्वतंत्र जागा मंजूर झालेली असून त्याची कागदपत्राची पूर्तता त्वरित पूर्ण करून ती जागा ताब्यात घेऊन तेथे कांदा लिलाव सुरू करावा, तालुक्यातील सर्व भुसारमालाची खरेदी विक्री बाजार समितीत करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन काल शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.शहर प्रमुख सनी वाघ यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत