राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा अन् का...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा अन् कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माञ नियोजित वेळ होऊनही समाधानकारक कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्याने त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आल्याची कुजबुज कार्यक्रमस्थळी होत होती. या कार्यक्रमास पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. म्हणून भाजप व विखे यांचे समर्थक दुपारपासून कार्यक्रम स्थळी हजर झाले होते. माञ कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे अन् खा. लोखंडेंच्या नाराजीमुळे या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा होत होती.शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असुन प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे अन् वंचितकडून उत्कर्षा रूपवते अशी तिरंगी लढत होत आहे.
यादरम्यान प्रत्येक पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे. खा. सदाशिव लोखंडे यांची राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह ३२ गावांमधे कमालीचा नाराजीचा सुर आहे. त्यामुळे या ३२ गावांमधे प्रचार करण्याच्या उद्देशाने निवडणूक तोंडावर आल्यानंतर संपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सायंकाळी ४ वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती. माञ सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजपाचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची गर्दीच न झाल्याने खा. लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली आहे. पालकमंञी राधाकृष्ण विखे , मंत्री दादा भुसे यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असल्याने त्यांनी देखील खाजगीत आयोजकांना चांगलेच झापल्याची चर्चा आहे.
खासदार लोखंडे यांच्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे ठिकाण नवीन कार्यालय समोर किंवा बाजार तळावर ठेवण्यात यावा असे चर्चेतून पुढे आले मात्र एका संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम ठेवल्यामुळे व स्थानिक राजकीय कलहातून अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवले असल्याचे देखील चर्चा होती.
कार्यक्रम स्थळापासून सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा सरळ नगरच्या दिशेने भरधाव वेगाने रवाना झाला. कार्यक्रम स्थळी न थांबता त्यांनी या ठिकाणावरून जाणे पसंत केले येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे हि नामुष्की आल्याने विखे यांनी नाराजी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत