श्रीरामपुर/वेबटीम:- श्रीरामपूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप समोर आला आहे. काँग्रेस पक्षाचे तब्बल १० ते १२ माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम...
श्रीरामपुर/वेबटीम:-
श्रीरामपूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप समोर आला आहे. काँग्रेस पक्षाचे तब्बल १० ते १२ माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असलेल्या या नेत्यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,अहिल्यानगर चे प्रभारी मा. श्री. विजयजी चौधरी, अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, तसेच माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, आणि वळद उंबरगाव येथील सरपंच विराज भोसले यांचा समावेश आहे. हे सर्व नेते जयंत ससाणे यांच्या राजकीय वारशाचे समर्थक आणि काँग्रेसमध्ये प्रभावी स्थान राखून होते.
प्रसंगी बोलताना संजय फंड यांनी स्पष्ट केले की, शहरातील रस्ते, पाणी, घरकुल योजना तसेच अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. सत्तेच्या बाहेर राहून या समस्या सोडवता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. फंड यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सलग बैठका सुरू होत्या. अखेर या बैठकीतून भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. या प्रवेश सोहळ्यामुळे श्रीरामपूरमध्ये भाजपचा झेंडा आता अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक प्रभागात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होणार असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार आहे.
श्रीरामपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी या प्रवेशामुळे झालेली आहे, हे निश्चित. या पक्ष प्रवेशावेळी , सोमनाथ गांगड, श्रीरामपुर पंचायत समिति उपसभापती सुनील क्षीरसागर, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन दिगंबर फरगडे, वैभव लोढा, दत्तात्रय धालपे, पराग शाह, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, योगेश डबीर, चिरायु नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे, सागर बर्वे यांच्यासह श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी- कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
“श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधा पूर्ण करणाऱ्या योजनांमुळे – जसे की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, 178 कोटींची जलयोजना, जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी, सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना व टपरीधारकांचे पुनर्वसन – या विकासगंगेचा भाग होण्यासाठी आणि श्रीरामपुर शहराच्या उज्वल भविष्यासाठी आज अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत!” – जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत