मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्षं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न "हॉट टॉपिक" ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्षं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न "हॉट टॉपिक" ठरतो. पक्ष कोणताही असो, प्रत्येक नेत्याच्या भाषणात मराठा समाजाच्या हक्काची हमी दिली जाते. परंतु सत्ता मिळाल्यावर हेच आश्वासन हवेत विरून जातं. खरं सांगायचं तर, मराठा आरक्षणाचं राजकारण हे निव्वळ आश्वासनांचं दुकान बनलं आहे.
आज प्रत्येक मराठा तरुण विचारतोय –
"हा प्रश्न समाजाचा आहे की राजकारण्यांच्या मतपेट्यांचा खेळ?"
राजकारणी बदलले, पक्ष बदलले, सरकारं बदलली… पण बदललं नाही ते म्हणजे मराठा समाजाचं ओझं. आज प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही, तर “आपल्याला मूर्ख समजलं जातंय का?” या भावनेचा आहे.
तरुणाईची झुंज आणि समाजाचे वेदन
मराठा युवक डोक्यावर पांढरी पट्टी बांधून, आईच्या हाताची ओलसर भाकरी खातो आणि बेरोजगारीची तगमग घेऊन आंदोलनात उभा आहे. त्याला मिळतं अश्रू आणि आश्वासनं दोन्ही, पण नोकरी नाही, संधी नाही, न्याय नाही.
न्यायालयीन लढाईच्या नावाखाली समाजाला वारंवार प्रतीक्षेत ठेवण्यात आलं आहे. यामुळे समाजामध्ये संभ्रम, असंतोष आणि अविश्वासाचं वातावरण पसरलं आहे. शेतकरी मुलं शिक्षणासाठी संघर्ष करताना दिसतात. अनेक वेळा कुटुंब शेतजमीन विकून फी भरतं, तर काही जण शहरात लहानमोठी मजुरी करून शिकतात.
तरीसुद्धा मराठा समाजाच्या डोळ्यांतली स्वप्नं अजूनही जिवंत आहेत. प्रश्न एवढाच आहे – ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे ठोस धोरण आहे का? की हा मुद्दा फक्त मतपेटीपुरता मर्यादित आहे?
आरक्षण: अस्तित्वाचा प्रश्न
मराठा समाजाच्या वेदना आता केवळ आरक्षणापुरत्याच नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनल्या आहेत. जर राजकीय पक्षांनी अजूनही आश्वासनांची ढकलाढकली चालू ठेवली, तर समाजाकडून उत्तर केवळ मतपेटीतूनच नव्हे तर रस्त्यावरूनही मिळू शकते.
मराठा समाजाची ताकद आणि भविष्य
मराठा समाजाने इतिहासात स्वराज्य उभारलं, संघर्ष केला आणि स्वाभिमान टिकवला. आजही समाजात उभारणीची ताकद कायम आहे – तरुणाईची झुंज, शेतकऱ्यांची मेहनत आणि कामगारांची चिकाटी हेच त्याचे प्रतिक आहेत.
पण फक्त राजकारण्यांकडून न्यायाची वाट पाहणे पुरेसे नाही. आजची गरज आहे – सत्यनिष्ठ धोरण, ठोस योजना आणि समाजाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न. जर समाज आणि नेतृत्व हातमिळवणीने काम केले, तर मराठा समाजाची शक्ती आणि स्वाभिमान इतिहासातच नाही, तर आजच्या काळातही तेजस्वी राहतील.
*लेखिका*
✍️ मनिषा रंजना बाळासाहेब लांबे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत