राहुरी : श्रेयस लोळगे राहुरी नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक आणि सध्या प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत असल्याने शहरातील विकासकामांन...
राहुरी : श्रेयस लोळगे
राहुरी नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक आणि सध्या प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत असल्याने शहरातील विकासकामांना खो लावला असून, नागरिकांचे दैनंदिन प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहेत. ओपन स्पेसमधील स्विमिंग पूलचे रखडलेले काम, कोर्ट रोडवरील अपूर्ण गटार योजना, त्याअंतर्गत खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे, तसेच अनेक रस्त्यांचे अपुरे डांबरीकरण हे सर्वच प्रश्न नागरिकांच्या सहनशीलतेला आव्हान देत आहेत.
नगरपरिषदेच्या मालमत्तांवरील शास्ती माफीची योजना, घरकुल योजनेतील हप्ते वितरण, अनुकंपा आणि वारस हक्कांतील रिक्त पदांची भरती, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन, मोकाट जनावरांचा बंदोबस्त यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णयच घेतले जात नसल्यामुळे प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र आहे.
"नगरपरिषदेकडे वर्कऑर्डर असताना, आणि काही प्रकल्पांवर शासनाचे स्पष्ट निर्देश असूनही प्रभारी मुख्याधिकारी असल्याने कार्यवाहीस विलंब होत आहे. शासनाने तातडीने राहुरी नगरपरिषदेकरिता पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावा, अन्यथा जनतेच्या भावना लक्षात घेता जनआंदोलन छेडावे लागेल," असा इशारा माजी नगराध्यक्ष डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी दिला आहे.
नागरिकांमध्ये वाढते असंतोषाचे वातावरण पाहता, शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित पावले उचलावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत