(राहुरी वेब प्रतिनिधी) राहुरी शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या, रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या वि...
राहुरी शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या, रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या विरोधात शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जनसेवा मंडळाच्या वतीने राहुरी नगरपरिषद प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. नागरिकांच्या या आंदोलनाला नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ उंडे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
नगरपरिषद सध्या प्रशासक राजवटीखाली कार्यरत असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहरातील दैनंदिन प्रशासन ठप्प झालं आहे. नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात, मुख्याधिकारीची तातडीने नियुक्ती, रखडलेली विकासकामे पूर्ण करणे, शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे हप्ते वितरीत करणे, दिव्यांग निधी दिवाळीपूर्वी वाटप करणे, १०० टक्के शास्ती माफी लागू करणे, तसेच मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करणे, डास प्रतिबंधक फवारणी आणि अनुकंपा भरतीची रिक्त पदे त्वरित भरणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
शहरातील जुना कनगर रोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, बचपन स्कूल, बिरोबा मंदिर परिसर, राहुरी ते काळे आखाडा रस्ता, व नांदेड वस्ती परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
या निवेदनावर माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, बाळासाहेब उंडे, प्रदीप भुजाडी,प्रल्हाद उंडे, नवनाथ तागड, नामदेव वराळे, अशोक तागड,भारत मतकर,युवा नेते सचिन उंडे, सौरभ उंडे,बापू मंडलिक, सुनील रासने, बापूसाहेब महाडिक, रवींद्र तनपुरे, भास्कर मंचरे, रमेश ठोकळे, विजय उंडे, डॉ. सुभाष जगधनी, प्रदीप वराळे, अक्षय तनपुरे, प्रमोद तोडमल, कांतीराम वराळे, संदीप भुजाडी, विनायक नांदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.
यासोबतच, नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ उंडे यांनीही या जनआंदोलनाला ठाम पाठिंबा देत, नागरिकांच्या न्याय्य मागण्यांना बळ दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य माणसाच्या अडचणी वाढल्या असून, हा लढा म्हणजे जनतेचा आवाज आहे. हा केवळ मोर्चा नाही, तर शहराच्या भवितव्याची लढाई आहे.”
प्रशासनाने जर या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आयोजकांनी दिला आहे. २६ सप्टेंबरचा मोर्चा शहराच्या विकासासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत