पुणे/वेबटीम:- राज्यातील कृषी विद्यापीठांसह विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेले पीएचडीचे विद्यार्थी सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या ...
पुणे/वेबटीम:-
राज्यातील कृषी विद्यापीठांसह विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेले पीएचडीचे विद्यार्थी सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या थकबाकीसाठी गेल्या पाच दिवसांपासून पुण्यातील गुडलक चौकात आंदोलनास बसले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून, भर पावसात त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.
या आंदोलनस्थळी काल माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
तनपुरे म्हणाले, “संशोधन हा विकासाचा गाभा आहे. जगातील प्रगत देशांमध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुर्दैवाने आपल्या शासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना फेलोशिप न मिळणे ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना चौकात आंदोलन करावे लागत असताना, शासनाचा एकही प्रतिनिधी विचारपूस करायला येत नाही, ही खेदजनक बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकीकडे शक्तिपीठ महामार्गासारख्या मागणी नसलेल्या प्रकल्पांवर अब्जावधी रुपये खर्च करण्यासाठी शासन पुढाकार घेतं, पण संशोधन करणाऱ्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. शासनाने तातडीने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांच्या फेलोशिपचे पैसे त्वरित उपलब्ध करून द्यावेत.”


कोणत्याही टिप्पण्या नाहीत