अहिल्यानगर अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या दुरुस्ती कामामुळे निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री ना. रा...
अहिल्यानगर
अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या दुरुस्ती कामामुळे निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य होमगार्ड विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.
महामार्गाच्या कामामुळे राहुरी शहर व परिसरातील अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून, एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक, प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम सर्वच यंत्रणांवर होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला होमगार्ड पथक उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने राज्य होमगार्ड महासमादेशकांकडे वाहतूक नियमनासाठी ३० दिवसांच्या कालावधीसाठी २० होमगार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून, दोन दिवसांपूर्वी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत