आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या हनुमान मंदिर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या एका असहाय्य आणि अनोळखी महिल...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या हनुमान मंदिर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या एका असहाय्य आणि अनोळखी महिलेला राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तत्परता दाखवत सुरक्षितपणे ‘स्नेहालय’ आश्रमात दाखल केले. त्यांच्या या कार्यामुळे ‘खाकी वर्दीतही एक संवेदनशील माणूस’ असतो, याचा प्रत्यय ग्रामस्थांना आला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुहा येथील हनुमान मंदिर परिसरात एक अनोळखी महिला अत्यंत दयनीय अवस्थेत वावरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ती महिला कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. ही बाब गंभीर असल्याचे ओळखून स्थानिक रहिवासी बबन ज्ञानदेव कोळसे व किरण भगवान कोळसे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय राजाभाऊ ठेंगे यांना संपर्क साधून माहिती दिली.
माहिती मिळताच ठेंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने चौकशी सुरू केली. त्यांनी स्वतः संबंधित महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आपली ओळख सांगण्यास असमर्थ होती. तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात घेऊन ठेंगे यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून अहिल्यानगर येथील ‘स्नेहालय’ वृद्धाश्रमाशी संपर्क साधला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या महिलेला सुरक्षितपणे आश्रमाच्या स्वाधीन करण्यात आले.
खाकी वर्दीतील देव!
"पोलिस म्हणजे केवळ दंडुका आणि कारवाई असं चित्र डोळ्यासमोर असतं. पण संजय ठेंगे साहेबांनी ज्या संवेदनशीलतेने त्या माऊलीला मदत केली, ते पाहता ते आमच्यासाठी 'खाकी वर्दीतील देव' ठरले आहेत.
स्वप्निल बाळासाहेब दिघे, ग्रामस्थ, गुहा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत