राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा गाव (देवळाली सब-डिव्हिजन) येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घड...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा गाव (देवळाली सब-डिव्हिजन) येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. गुहा ऐजी गावठाण परिसरातील शेती डीपीवरील केबल व कटआउट गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत होते. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार संबंधित लाईनमन व महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून मोटार सुरू होत नसल्याने शेतकरी बाळासाहेब साहेबराव खपके हे डीपीवर बिघाड तपासण्यासाठी गेले. डीपीवरील फ्युज गेले असल्याचे लक्षात आल्यानंतर ते फ्युज बसवत असतानाच अचानक तुटलेली केबल लोखंडी पोलला टच झाली. यामुळे मोठा स्पार्क होऊन जळत्या ठिणग्या त्यांच्या हातावर व अंगावर पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेस पूर्णपणे महावितरण जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न करता, “तुम्हीच काम करून घ्या, शेती डीपीसाठी साहित्य मिळत नाही” अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत