अहिल्यानगर/वेबटीम:- समाजातील प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय व...
अहिल्यानगर/वेबटीम:-
समाजातील प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस पाऊल उचलत होमगार्डचे तब्बल सुमारे सात लाख रुपयांचे मानधन स्वतःच्या पुढाकारातून जमा करून दिलेला शब्द खरा ठरवला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राहुरी परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात आली असून काही भागात डायव्हर्शन देण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. काही ठिकाणी अपघातांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी जानेवारी महिन्यात स्वतः घटनास्थळी भेट देत वाहतुकीचा आढावा घेतला. या वेळी नागरिक, व्यापारी व वाहनचालकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची नियुक्ती करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. शासनाकडे होमगार्डच्या मानधनाची स्वतंत्र तरतूद नसल्यास हे मानधन आपण स्वतः देऊ, असा स्पष्ट शब्द त्यांनी दिला होता.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या मागणीची तात्काळ दखल घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार 20 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत 19 होमगार्ड तर 4 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान आणखी 19 होमगार्ड अशा एकूण 39 होमगार्डनी नगर–मनमाड महामार्गावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या सेवेच्या माध्यमातून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून अपघातांचे प्रमाणही घटले आहे.
होमगार्डचे प्रतिदिन 1,283 रुपयांप्रमाणे एकूण 6 लाख 88 हजार 197 रुपये इतके मानधन देय झाले होते. दिलेला शब्द पाळत अहिल्यानगर शहर भाजपा व विखे पाटील परिवार यांच्या वतीने सुमारे सात लाख रुपयांचा धनादेश 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राहुरी शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टाळले जावेत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करून केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास जिंकला असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नगर–मनमाड महामार्गावरील वाहतुकीच्या समस्येवर प्रभावी उपाय करत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून प्रश्न सोडवता येतात, याचे हे उदाहरण मानले जात आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेण्याची भूमिका यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत